Surah Fatir ( The Orignator )

Surah Fatir ( The Orignator ) - Marathi Aya count 45

१. त्या अल्लाकरिता समस्त स्तुती - प्रशंसा आहे, जो आकाशांना आणि धरतीला निर्माण करणारा आणि दोन दोन, तीन तीन आणि चार चार पंख बाळगणाऱ्या फरिश्त्यांना आपला संदेशवाहक बनविणारा आहे१ सृष्टीनिर्मितीत जे इच्छितो वाढवितो. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगणारा आहे.
२. अल्लाह जो दया - कृपा (द्वार) लोकांकरिता उघड करील तर त्यास कोणी बंद करणारा नाही आणि ज्याच्यासाठी बंद करील तर त्यानंतर त्यास कोणी सुरू करणारा (उघडणारा) नाही आणि तोच जबरदस्त हिकमतशाली आहे.
३. लोकांनो! तुमच्यावर अल्लाहने जे उपकार केले आहेत, त्यांचे स्मरण करा. काय अल्लाहखेरीज दुसराही कोणी निर्माता आहे, जो तुम्हाला आकाशातून आणि जमिनीपासून रोजी (आजिविका) देत असावा? त्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही, तेव्हा तुम्ही कोठे उलट जात आहात?
४. आणि जर ते तुम्हाला खोटे ठरवितात तर तुमच्या पूर्वीचे (सर्व) पैगंबरही खोटे ठरविले गेले आहेत आणि समस्त कार्ये अल्लाहच्याचकडे परतविले जातात.
५. हे लोकांनो! अल्लाहचा वायदा सच्चा आहे. ऐहिक जीवनाने तुम्हाला धोक्यात न टाकावे आणि ना दगाबाज (सैताना) ने तुम्हाला गफलतीत मग्न ठेवावे.
६. (लक्षात ठेवा) सैतान तुमचा शत्रू आहे, तुम्ही त्याला शत्रूच जाणा, तो तर आपल्या टोळीला केवळ अशासाठी बोलवितो की ते सर्व जहन्नममध्ये जाणारे व्हावेत.
७. जे लोक काफिर (इन्कारी) झाले, त्यांच्याकरिता सक्त अज़ाब आहे आणि ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले त्यांच्यासाठी क्षमा आणि मोठा चांगला मोबदला आहे.
८. काय तो मनुष्य, ज्याच्याकरिता त्याची दुष्कर्मे सुशोभित केली गेली आहेत तर तो त्यां (कर्मां) ना चांगले समजतो (काय तो मार्गदर्शन प्राप्त करणाऱ्या माणसा समान आहे?) (निश्चितच) अल्लाह ज्याला इच्छितो, मार्गभ्रष्ट करतो, आणि ज्याला इच्छितो मार्ग दाखवितो. तेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल दुःखी कष्टी होऊन आपला जीव कष्ट यातनेत टाकू नये. हे लोक जे काही करीत आहेत निःसंशय, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.
९. आणि अल्लाहच वाऱ्यांना वाढवितो, जे ढगांना उंच नेतात, मग आम्ही त्या ढगांना कोरड्या जमिनीकडे नेतो आणि त्याद्वारे त्या जमिनीला तिच्या मृत्युनंतर (पुन्हा) जिवंत करतो. अशाच प्रकारे दुसऱ्यांदा जिवंत होऊन उठणेही आहे.
१०. जो मनुष्य मान-सन्मान प्राप्त करू इच्छित असेल, तर (त्याने जाणून घ्यावे की) समस्त मान-प्रतिष्ठा अल्लाहकरिताच आहे. समस्त पवित्र वचने त्याच्याचकडे चढतात आणि सत्कर्म त्यांना उंचविते, आणि जे लोक दुष्कर्मांच्या कट कारस्थानात व्यस्त राहतात, त्यांच्यासाठी मोठा सक्त अज़ाब आहे आणि त्यांचे हे पाखंड नाश पावेल.
११. लोक हो! अल्लाहने तुम्हाल मातीपासून निर्माण केले, मग वीर्यापासून, मग तुम्हाला जोडी (जोडपे नर-नारी) बनविले. स्त्रियांचे गर्भ धारण करणे आणि बाळाचे जन्म घेणे, या सर्वांचे त्याला ज्ञान आहे, आणि कोणताही आयुष्यमान दीर्घायुष्य प्राप्त करीत नाही आणि ना कोणाचे आयुष्य घडते, परंतु हे सर्व एका ग्रंथात अस्तित्वात आहे. अल्लाकरिता ही गोष्ट फार सोपी आहे.
१२. आणि दोन समुद्र समान नाहीत. हा गोड आहे, तहान भागवितो, प्यायला चांगला आणि तो दुसरा खारट आहे, कडू. तुम्ही या दोघांपासून ताजे मांस खाता आणि ते दागिने काढता, ज्यांना तुम्ही अंगावर घालता आणि तुम्ही पाहता की मोठमोठ्या नावा, पाण्याला छेदणाऱ्या, त्या समुद्रात आहे, यासाठी की तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा आणि यासाठी की तुम्ही त्याचे आभार मानावेत.
१३. तो रात्रीला दिवसात आणि दिवसाला रात्रीत दाखल करतो आणि सूर्य व चंद्राला त्यानेच कामास लावले आहे. प्रत्येक एका निर्धारित अवधीपावेतो चालत आहे. हाच अल्लाह होय, तुम्हा सर्वांचा पालनकर्ता. त्याचीच राज्य सत्ता आहे, आणि ज्यांना तुम्ही त्याच्याखेरीज पुकारत आहात, ते तर खजुरीच्या बी सालपटाचेही मालक नाहीत.
१४. जर तुम्ही त्यांना पुकाराल तर ते तुमची पुकार ऐकणारच नाहीत. आणि जर (समजा) ऐकूनही घेतील तर कबूल करणार नाहीत. किंबहुना कयामतच्या दिवशी तुमच्या शिर्क (अनेकईश्वरउपासना ) चा साफ इन्कार करतील१ आणि तुम्हाला कोणीही अल्लाहसारखा जाणकार (वास्तवपूर्ण) खबरी देणार नाही.
१५. लोक हो! तुम्ही अल्लाहचे भिकारी आहात आणि अल्लाहच निःस्पृह (गरज नसलेला) प्रशंसनीय आहे.
१६. जर त्याने इच्छिले तर तुमचा सर्वनाश करून टाकील आणि एक नवी निर्मिती (सृष्टी) निर्माण करील.
१७. आणि ही गोष्ट अल्लाहकरिता काहीच कठीण नाही.
१८. आणि कोणीही ओझे उचलणारा, दुसऱ्याचे ओझे उचलणार नाही आणि जर कोणी जास्त वजनाचे ओझे बाळगणारा आपला भार उचलण्याकरिता दुसऱ्या कोणाला बोलविल तर तो त्यातून काहीच उचलू शकणार नाही, मग तो जवळचा नातेवाईक का असेना. तुम्ही केवळ अशांनाच सावध करू शकता, जे पाहिल्याविनाच आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगतात आणि नमाज नियमितपणे पढतात आणि जो पाक (स्वच्छ - शुद्ध) होईल, तो आपल्याच फायद्यासाठी पाक होईल आणि (शेवटी) अल्लाहकडेच परतून जायचे आहे.
१९. आणि आंधळा व डोळस दोन्ही समान नाहीत.
२०. आणि ना अंधार आणि ना प्रकाश.
२१. आणि ना सावली आणि ना ऊन.
२२. आणि जीवित व मृत दोघे समान असू शकत नाही, आणि अल्लाह ज्याला इच्छितो ऐकवितो, आणि तुम्ही त्या लोकांना ऐकवू शकत नाही, जे कबरींमध्ये आहेत.
२३. तुम्ही तर फक्त खबरदार करणारे आहात.
२४. आम्हीच तुम्हाला सत्यासह खूशखबर ऐकविणारा आणि भय दाखविणारा बनवून पाठविले आहे आणि कोणताही जनसमुदाय असा होऊन गेला नाही की ज्यात एखादा खबरदार करणारा आला नसावा.
२५. आणि जर हे लोक तुम्हाला खोटे ठरवतील तर त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीही खोटे ठरविले होते, त्यांच्याजवळदेखील त्यांचे पैगंबर मोजिजे (ईशचमत्कार), सहीफे (पोथी) आणि स्पष्ट ग्रंथ घेऊन आले होते.
२६. मग मी त्या काफिरांना (सत्य-विरोधकांना) धरले, तर कशी होती माझी शिक्षा!
२७. काय तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिले नाही की अल्लाहने आकाशातून पाणी अवतरित केले, मग आम्ही त्याच्याद्वारे अनेक रंगाची फळे निर्माण केली आणि पर्वतांचेही अनेक हिस्से आहेत सफेद आणि लाल की त्यांचे देखील अनेक रंग आहेत आणि गडद काळेही.
२८. आणि अशाच प्रकारे माणसांमध्ये, जनावरांमध्ये आणि चतुष्पाद प्राण्यांमध्येही काही असे आहेत ज्यांचे रंग वेगवेगळे आहेत. अल्लाहशी त्याचे तेच दास भय राखतात, जे ज्ञान बाळगतात. वास्तविक अल्लाह मोठा वर्चस्वशाली, माफ करणारा आहे.
२९. जे लोक अल्लाहच्या ग्रंथाचे पठण (तिलावत) करतात आणि नमाज नित्य नेमाने पढतात आणि जे काही आम्ही त्यांना प्रदान केले आहे त्यातून गुप्तपणे आणि उघडपणे खर्च करतात, ते अशा व्यापाराची आशा बाळगतात, जो कधीही तोट्यात राहणार नाही.
३०. यासाठी की त्यांना त्यांचा मोबदला पुरेपूर दिला जावा आणि त्यांना आपल्या कृपेने आणखी जास्त प्रदान करावे. निःसंशय, तो मोठा माफ करणारा, गुणग्राहक आहे.
३१. आणि हा ग्रंथ जो आम्ही तुमच्याकडे वहयी (प्रकाशना) द्वारे पाठविला आहे तो पूर्णतः सत्य आहे, जो आपल्या पूर्वीच्या ग्रंथांचीही पुष्टी करतो. निःसंशय, अल्लाह आपल्या दासांची पूर्ण माहिती ठेवणारा, चांगल्या प्रकारे पाहणारा आहे.
३२. मग (या) ग्रंथाचा उत्तराधिकारी आम्ही त्या लोकांना बनविले, ज्यांना आम्ही आपल्या दासांमधून निवडून घेतले. मग काही तर आपल्या प्राणांवर अत्याचार करणारे आहेत, आणि काही मध्यम दर्जाचे आहेत आणि त्यांच्यापैकी काही अल्लाहने दिलेल्या तौफिक (सुबुद्धी) ने सत्कर्मात पुढेच जात राहतात. हा फार मोठा अनुग्रह आहे.
३३. सदैव काळ राहण्याच्या त्या बागा आहेत, ज्यात हे लोक प्रवेश करतील, तिथे त्यांना सोन्याची कांकणे आणि मोती (अंगावर) घातली जातील आणि तिथे त्यांची वस्त्रे रेशमाची असतील.
३४. आणि म्हणतील की अल्लाहचे अनंत उपकार आहेत, ज्याने आमच्यापासून दुःख दूर केले. निःसंशय, आमचा पालनकर्ता मोठा माफ करणारा आणि कदर जाणणारा आहे.
३५. ज्याने आम्हाला आपल्या कृपेने सदैव काळ राहण्याच्या ठिकाणी उतरविले, जिथे ना आम्हाला काही कष्ट पोहोचेल आणि ना कसला थकवा जाणवेल.
३६. आणि जे लोक काफिर (इन्कारी) आहेत, त्यांच्यासाठी जहन्नमची आग आहे, ना तर त्यांना मृत्यु येईल की ते मरुन जावेत आणि ना जहन्नमची शिक्षाच कमी केली जाईल. आम्ही प्रत्येक काफिराला अशीच शिक्षा - यातना देतो.
३७. आणि ते लोक त्यात (जहन्नममध्ये) मोठमोठ्याने ओरडतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला (यातून) बाहेर काढ आम्ही चांगले कर्म करू, त्या कर्मांखेरीज, जे आम्ही करीत होतो (अल्लाह फर्माविल) की काय आम्ही तुम्हाला एवढे आयुष्य दिले नव्हते की ज्याला समजून घ्यायचे असते, तो समजू शकत होता१ आणि तुमच्याजवळ खबरदार करणाराही पोहचला होता,२ तेव्हा आता गोडी चाखा (अशा) जुलमी अत्याचारी लोकांचा कोणीही सहाय्य करणारा नाही.
३८. निःसंशय, अल्लाह आकाशांच्या आणि जमिनीच्या लपलेल्या वस्तूंना जाणणारा आहे. निःसंशय, तो छातीतल्या (मनातल्या) गोष्टींनाही जाणणारा आहे.
३९. तोच असा आहे, ज्याने तुम्हाला धरतीवर बसविले, तेव्हा जो मनुष्य कुप्र (इन्कार) करील तर त्याच्या कुप्रचे ओझे त्याच्यावरच येईल आणि काफिर लोकांकरिता, त्यांचा इन्कार त्यांच्या पालनकर्त्याजवळ क्रोध वाढविण्याचेच कारण ठरतो आणि काफिरांसाठी त्यांचा इन्कार नुकसान वाढविण्याचीच सबब ठरतो.
४०. (तुम्ही) सांगा की तुम्ही आपल्या (ठरविलेल्या) सहभागी ईश्वरांची अवस्था तर सांगा, त्यांना तुम्ही अल्लाहखेरीज पुकारीत असता, अर्थात मला हे सांगा की त्यांनी धरतीचा कोणता (हिस्सा) बनविला आहे किंवा त्यांचा आकाशात काही सहभाग आहे अथवा आम्ही त्यांंना एखादा ग्रंथ दिला आहे की हे त्याच्या पुराव्यावर अटळ असावेत? नव्हे, किंबहुना हे अत्याचारी एकमेकांशी केवळ फसवणुकीच्या गोष्टींचे वायदे करीत असतात.
४१. निःसंशय, अल्लाहने आकाशांना आणि जमिनीला धरून ठेवले आहे की ते डगमगू नयेत आणि जर ते डगमगले तर मग अल्लाहखेरीज कोणी त्यांना धरूही शकत नाही. निःसंशय तो मोठा सहनशील, माफ करणारा आहे.
४२. आणि या काफिर लोकांनी मोठी दृढशपथ घेतली होती की जर त्यांच्याजवळ कोणी खबरदार करणारा आला तर ते प्रत्येक समुदाया (उम्मत) पेक्षा जास्त मार्गदर्शन प्राप्त करणारे बनतील, मग जेव्हा त्यांच्याजवळ एक पैगंबर येऊन पोहोचला तेव्हा त्यांच्या तिरस्कारातच प्रगति झाली.
४३. जगात स्वतःला मोठा समजल्यामुळे आणि त्यांच्या वाईट प्रयत्नांमुळे आणि वाईट प्रयत्न करणाऱ्यांची शिक्षा ते प्रयत्न करणाऱ्यांनाच भोगावी लागते तर काय हे त्याच व्यवहाराच्या प्रतीक्षेत आहेत, जो पूर्वीच्या लोकांशी केला जात राहिला? तेव्हा तुम्हाला अल्लाहच्या पद्धतीत कधीही बदल आढळणार नाही आणि तुम्हाला अल्लाहच्या नियमात कधी बदल होत असलेला आढळणार नाही.
४४. काय हे लोक धरतीवर हिंडले फिरले नाहीत की त्यांनी पाहिले असते की जे लोक यांच्यापूर्वी होऊन गेलेत, त्यांचा अंत कसा झाला. वास्तविक ते लोक यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली होते. आणि आकाशांमध्ये व धरतीवर अशी कोणतीही वस्तू नाही जी अल्लाहला लाचार करील. तो सर्व काही जाणणारा, मोठा सामर्थ्यशाली आहे.
४५. आणि जर अल्लाह, लोकांना त्यांच्या कर्मांमुळे त्वरित पकडीत घेऊ लागला असता तर संपूर्ण धरतीवर एक जीवदेखील सोडला नसता तथापि अल्लाह त्यांना एका निर्धारित समयापर्यंत सवड देत आहे, तर जेव्हा त्यांची ती वेळ येऊन पोहोचेल तेव्हा अल्लाह आपल्या दासांना स्वतः पाहून घेईल.
Share